Wednesday, September 28, 2022

नजरेतला दृष्टिकोन


        नजरेतला दृष्टिकोन

  काल मुलाने ढगाकडे बोट दाखवून त्यातील आकार दाखवले.त्याच्या नजरेतून बघितल्यावर खरोखर तो आकार दिसला.आपण लहान होतो तेव्हा उन्हाळ्यात चांदण्या रात्री गच्चीवर झोपायला गेल्यावर चांदण्यांकडे पहात आम्ही वेगवेगळे आकार पाहायचो,चांदण्या जोडून चित्र तयार करायचो. मोठ्या माणसांना झोपायचं असायचं.ते झोपा रे म्हणायचे.ती लहानपणाची नजर गेली कुठे.दरवेळी माझंच खरं. मी ज्या नजरेतून बघतोय तेच बरोबर.असं कसं असू शकतं ? थोड्याश्या वेगळ्या नजरेतून बघितलं तर जग आणखी सुंदर दिसू लागतं.

             सकाळीच खमंग फोडणीचा वास आला,काय भाजी करणं चालू आहे  हे बघायला स्वयंपाक घरात गेल्यावर मसाल्याच्या डब्यातल्या मसाल्यांकडे माझं सहज लक्ष गेलं.थोडी पिवळी दिसणारी हळदीची चव घेऊन बघितली कडवट वाटली,थोडं लाल तिखट जिभेवर ठेवलं लगेच हा करत पाणी प्यावं लागलं,पांढरेशुभ्र आहे म्हणू  थोडं मीठ पण जिभेवर ठेवलं तेवढ्यात बायकोनं विचारलं हे काय प्रयोग चालू आहेत आज.मी काही नाही म्हणून विषय टाळला.पण मनात जो विचार आला होता त्यानंतर एकामागून एक विचार चालूच राहिले की रंग,रूप,आकार,चव या सगळ्यांनी हे किती वेगवेगळे आहेत. मसाल्याचं वेगवेगळं  असणं हे त्यांचं अस्तित्व असतं. पण जेवण तयार करतांना सर्व मसाले एकत्र करावेच लागतात,काहींना तळावे लागते,काही भाजावे लागतात,काही बारीक करावे लागतात.जेवण तयार करतांना काही मसाल्यांचा वास येतो,काहींमुळे ठसका लागतो,काहींचा रंग बदलतो,काही काही मसाले तर एकत्र होतांना कुठे मिसळून एकजीव झाले कळतही नाहीत,मात्र त्यांची चव तशीच राहते.अशा जेवणाचा जेव्हा आपण आस्वाद घेतो, तेव्हा ती गोडी काही निराळीच.इथं आपण मसाल्याना  नावं नाही ठेवत,की हा तिखट आहे याने सारखाच खाट उठतो हा नको बाबा,हा खूप खारट आहे हा पाहिजे पण चवीपुरता,हा दिसायला कसलाच आहे,ही हळद कडवट आहे नको बाबा असं कधी म्हणतो आपण.चिंच आंबट आहे कशाला टाकायची भाजीला असंही म्हणत नाही.उलट सर्व मसाले व्यवस्थित टाकतो आणि पुन्हा डबाबंद करून एकत्रीतच ठेवतो.आपल्या आयुष्यात येणारी माणसं पण मसल्यासारखीच असतात.  माणसं दूर असतात तेव्हा वेगळीच भासतात.वेगळीच दिसतात.दुरून का होईना फोनवर संवाद झाल्यावर वेगळीच आहेत म्हणजे चांगली आहेत आणि प्रत्यक्ष भेटल्यावर खरंच माणसं खूप चांगली असतात असाच अनुभव सर्वाना येतो.जर असं आहे तर मग घोडं पेंड कुठं खातंय,अडलंय कुठं असं वाटायला लागतं.तर माणसांबद्दल आपण बनवलेली प्रतिमा आणि त्या प्रतिमेला पूर्वग्रह मनात ठेवून आपण कुठल्याही माणसांबद्दल करत असलेला विचार.मुळात ही प्रतिमा आपण बनवलेलीच नसते.

               कुठल्याही माणसांबद्दल प्रत्येकाला आलेले अनुभव हे सारखे नसतात.आणि सोबत असणाऱ्या काही माणसांना सारखे अनुभव आले म्हणून तो व्यक्ती तसाच आहे असे नाही.म्हणजे काय तर आपले लहानपणापासूनचे अनुभव,संस्कार तसेच आपण ज्या वातावरणातून येतो ते सामाजिक आणि कौटुंबिक वातावरण,आपली आर्थिक स्थिती,आपला बुद्ध्यांक,आपले शिक्षण,आपल्याला आलेले अनुभव,ज्या माणसांचा आपल्या जीवनावर प्रभाव आहे त्यांचा दृष्टिकोन,आपली संगत या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन आपला जगाकडे बघण्याचा एक चष्मा तयार होतो.म्हणजे प्रत्येकाचा चष्मा वेगळाच असणार,तो चुकीचा मुळीच नाही वेगळा आहे,म्हणून तो योग्यच आहे असेही नाही पण हा चष्मा प्रत्येकाला प्रिय मात्र असतो.त्याप्रमाणे काहींना जग लाल दिसेल कारण त्यांनी लाल रंगाचा चष्मा घातलेला आहे, काहींना निळं, काहींना पिवळं,काहींना पोपटी,काहींना केशरी तर काहींना काळे दिसेल.ज्यांनी ज्या रंगाचा चष्मा डोळ्यांवर चढवला असेल तसेच जग दिसते. आता इथे एक गंमत आहे,प्रत्येकाला मी जसे जग बघतोय तेच खरे आहे असे वाटणार.जग त्याच रंगाचे आहे असे वाटणार.माझेच खरे आहे असे वाटणार.इथे मग कितीही वय झाले तरी तेच वाटत राहते,त्यात भर पडते ती ते आमचे केस पांढरे झालेत ते उगाच काय या प्रश्नाने आपण इतरांना गप्प करतो.आपण जर जग दुसऱ्यांच्या नजरेतून बघायला गेलो.तर थोडा वेळ पटेलही,पण ज्या धारणा पक्क्या झालेल्या आहेत.त्याचं काय.

                    एखादी पांढरीशुभ्र भिंत लाल रंगाचा चष्मा असणाऱ्या व्यक्तीला लाल दिसेल तर हिरव्या रंगाचा चष्मा असणाऱ्याला हिरवी दिसेल पण मुळात भिंत पांढरी आहे,हेच सत्य आहे.तसंच आपलं माणसांबद्दल होतंय,माणसं मुळात वेगळीच असतात.खरंतर जगात जास्तीत जास्त माणसे ही खूप चांगली आणि प्रेमळच असतात.पण कुणीतरी सांगितलं म्हणून आपण त्याच्या नजरेतून एखाद्या व्यक्तीला बघतो आणि मनात एक प्रतिमा तयार करतो.त्या व्यक्तीचा आपला काही संबंध नाही व्यवहार नाही,तरीही वाईट प्रतिमा इतरांमुळे तयार होते. पण ज्या वेळी प्रत्यक्षात ती व्यक्ती भेटते कालांतराने बोलणे होते तेव्हा हळूहळू लक्षात यायला लागते की ही व्यक्ती तर खूप चांगली आहे.मी असा कसा विचार करत होतो.आपली आपल्यालाच कीव यायला लागते.याच्या उलट देखील अनुभव येतात, आपल्याला वारंवार ज्या व्यक्तींकडून वाईट अनुभव येत असतात नेमकं त्या व्यक्तीबद्दल बाहेरून खूप चांगले अनुभव ऐकायला येतात,चुकूनही चुकीचे,वाईट ऐकायला येत नाही.तेव्ह आपलीच कुठेतरी चूक झाली असणार असे प्रयत्न मनात यायला लागतात.आपला चष्मा मग तो कुठल्याही रंगाचा असेल कदाचित नंबर तपासायची गरज आहे असा प्रश्न स्वतःला पडलाच पाहिजे.भय,मत्सर,द्वेष,राग,अहंकार यांचेही चष्मे असतात.लोक त्यातून जगाला बघतात आणि मते बनवतात.ती मतं सहज एखाद्या व्यक्तीला चिकटवली ही जातात.पण त्यामुळे त्या व्यक्तीचे खरे स्वरूप आपल्याला कळायला वेळ लागतो यात खरे तर आपलेच नुकसान होते.

               इतरांच्या दृष्टिकोनातुन इतरांच्या नजरेतून जग बघतांना खूप वेळेस आपण आपलेच नुकसान करत असतो.अशामुळे आपले नातेसंबंध दुरावतात,तुटतात.मित्र दुरावतात.विश्वास कमी होतो.खूप चांगल्या व्यक्तींना आपण कायमचे दुरवतो.भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत संवाद महत्वाचा असतो.आपण घटनांकडे आणि माणसांकडे कोणत्या नजरेतून बघतो हे ही महत्वाचे.प्रत्येकाकडे थोडा आपला चष्मा आणि इतरांनी त्यांची सांगितलेली मते बाजूला ठेवून स्वतःच्या स्वच्छ नजरेतून माणूस म्हणून आणि निर्मळ भावनेने बघायला हवे.भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काही शिकता येते का ते पहावे.माणूस म्हटला की प्रत्येकाला व्याधी असणारच,काहीना काही दुखणे असतेच त्यावर फुंकर मारावी.समजून घ्यावे.प्रत्येकाला ताण असतोच.तो जरासा सैल होईल असा मैत्रीपूर्ण संवाद असावा.एखाद्या वस्तूला जर आपण 360° ने वेगवेगळ्या कोनातून बघू शकतो.तर माणसांकडे बघण्यातला प्रत्येकाचा नजरेतला दृष्टिकोन किती वेगवेगळा असावा.प्रत्येक कोनातून बघितल्यास हे जग आणि ही माणसं अधिकच सुंदर दिसतील.


                                            श्री.प्रदीप सुरवसे

                                             9545554637