Saturday, June 5, 2021

मनातला कचरा

लेख : मनातला कचरा
मनातला कचरा
        © प्रदीप सुरवसे

  आपण बाजारातून फळे भाजीपाला आणतो.तो खाऊन उरलेला टाकाऊ,शब्दाकडे लक्ष द्या,टाकाऊ भाग म्हणजे फळांचे छिलके,साली आपण घरातल्या कचरपेटीत टाकतो आणि विसरून जातो.आपण वेळीच ती कचरपेटी रिकामी करायला पाहिजे होती ते आपण विसरतो.काही दिवसांनी त्यावर आणखी कचरा टाकत राहतो.आणि हळूहळू दुर्गंध यायला लागते तेव्हा घरातील माणसं विचार करायला लागतात की एवढा दुर्गंध कुठून येत आहे.कचऱ्यामुळे वातावरण दूषित होते.आणि मग अचानक लक्षात येते की हा तर आपणच टाकलेला जपून ठेवलेला कचरा आहे.त्याचाच दुर्गंध येत आहे.त्यात जे कधीतरी टाकलं होतं ते सडलं आहे.बुरशी झाली आहे.त्याला लगेच रिकामं करावं लागेल नाहीतरी रोग पसरतील आणि ते परवडणार नाही.
            आपलं घर आपण रोज स्वच्छ करतो.कारण रोज धूळ येते.परिसर स्वच्छ ठेवतो.पण कधी विचार केलाय की मनाच्या स्वच्छतेचं काय? मनातल्या साठत जाणाऱ्या कचऱ्याचं काय ?
            हो मनातला कचरा म्हणजे काय.सहज आणि कळत नकळत आपल्याला कुणीतरी काहीतरी बोलते.नात्यामध्ये एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक बोलते कारण मोठे असल्याने त्यांचा तो अधिकार असतो.शब्द साधेच असतात.पण ज्याला बोलले गेलंय त्याला खूप लागतात.काही व्यक्ती खूप मोकळ्या मनाच्या असतात.त्या हे शब्द मनाला लावूनच घेत नाहीत.आणि लागले तरी सोडून देतात.पण खूप जणांच्या बाबतीत असं घडतं की ते हे शब्द जपून ठेवतात जाणीवपूर्वक. काहींचे त्यांच्या अहंकारामुळे सहज जपले जातात.माणसं वयाने,पैशाने, संपत्तीने जेवढे मोठे असतात किंवा होत जातात त्यात तेवढा अहंकार येत जातो.
          खूपदा आपल्याला एखाद्याचा राग येतो.कुणी रागात बोललेले शब्द मनातून जात नाहीत.एखाद्याचा उगाच हेवा वाटत राहतो.मानवी स्वभाव आहे.काहीजण तर जो प्रगती करत असतो त्याच्यावर विनाकारण जळत असतात.त्याचा द्वेष करत असतात.खूप लोकांना असंही म्हणताना बघितलंय की मला त्याचं तोंड बघितलं की राग येतो.कोणी आपल्याला वाईट शब्द बोलला तर ते मानत साठवून ठेवतो आणि पुन्हा पुन्हा मनाला सांगत राहतो की मी त्याला माफ करणार नाही.मी त्याने बोललेलं विसरणार नाही. एवढेच कशाला लोक तर माणूस मेल्यावर ही त्याला सोडत नाहीत.
            पती-पत्नी,नातेवाईक,मित्र,व्यवसाय संबंधी लोक यांच्याशी आपला व्यवहार होत असतो.संवाद होत असतो.असा संवाद होताना कधी कधी वाद देखील होतो.ते म्हणतात ना भांड्याला भांडं लागणं तसं. आपल्या सर्वांची मतं वेगवेगळी.आणि प्रत्येकाला स्वतःचं मत महत्वाचं वाटणार हे साहजिकच.आणि त्यातूनच मग वाद होणार.जी लोकं भावनेनं जास्त जोडलेली असतात त्यांचेच शब्द एकमेकांना लागतात.आता होतं काय तर हे सगळं जपलेलं याचा हळू हळू दुर्गंध यायला लागतो.आणि आपण म्हणतो की ती व्यक्ती आता पहिल्यासारखी राहिली नाही.कुणीतरी कान भरलेत.ती अमुक एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून असं वागत आहे.पण तसं काही नसतं.हा जो वेगवेगळा कचरा आपल्या मनात साठलेला असतो.कचराच ना ज्याचा उपयोग नाही.जे फेकून द्यायला पाहिजे असे शब्द,घटना,प्रसंग,वागणं,अहंकार,मीपणा,अविश्वास ,दुसऱ्याला सतत गुन्हेगार ठरवण्याची वृत्ती हा सर्व आणि कचरा म्हणून काय काय वर्णन करावं.मनातला कचरा तो ज्याने तुम्हाला त्रास होतो,नाती बिघडतात ते सर्व. 
           अशा कचऱ्याचा निचरा कसा करायचा.अगोदर नेमकं आपल्या मनात काय चालू आहे ते तर कळलं पाहिजे.त्यासाठी एखादी निवांत जागा शोधा किंवा तुमची ज्यावर श्रद्धा आहे अशा एखाद्या प्रार्थनास्थळी जा.तिथे डोळे लावून शांत बसा.आणि फक्त मनात येणाऱ्या विचारांकडे लक्ष द्या.आता ज्या तुमच्या संबंधातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल मनात विचार येतील आणि हळू हळू त्या व्यक्तीबद्दल जर राग,द्वेष,मत्सर,हेवा असे विचार येत असतील.तर हा त्या व्यक्तीबद्दलचा कचरा आहे समजा.आणि मी त्या व्यक्तीला माफ केले आहे असे म्हणा अगदी मनातून म्हणा.मनातून ह्रदयापासून त्या व्यक्तीला माफ करा.कटू प्रसंग मी सोडन देत आहे.असं पुन्हा पुन्हा म्हणा.ज्यांच्या सोबत तुमचे संबंध बिघडले आहेत.त्यांच्याबद्दल ही कृती पुन्हा पुन्हा करा.मनातून विचार करा की ती व्यक्ती मानसिक भावनिक पेशन्ट आहे.मग समोरची व्यक्ती वयाने,पदाने, आणि पैशाने कितीही श्रीमंत असेल तरी.आणि जे काही मनात धरून ठेवलंय ते सोडून द्या.हळू हळू तुम्हाला हलकं वाटायला लागेल.आयुष्यात तुम्ही ज्याला कधीच माफ करणार नाही त्याला मनातून माफ तर करून पहा.तुमच्या मनाची अवस्था नक्की बदलणार.
            असं केल्याने त्या व्यक्तीत तिच्या वागण्यात बोलण्यात लगेच काहीच बदल होणार नाही.पण आपल्याला स्वतःला हलके,उत्साही,आंनदी वाटायला लागेल.मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटू लागेल.मनातला कचरा कुठेतरी रिकामा झाला असं वाटेल.
          काहीजण असे म्हणतात की पण समोरची व्यक्ती बदलत नाही तिच्या वागण्याने मला त्रास होतो.ती अशी आहे,ती तशी आहे.आपल्याला इतरांमध्ये बदल करायचा नाही.कारण आपण तो करू शकणार नाही.मुळात काय तर दुसऱ्याची घरं झाडायला जायचं नाही.एवढं सगळं करून समोरचा माणूस बदलेल अशी अपेक्षा ठेवायचीच नाही.कारण तो तेव्हाच बदलेल जो तो ठरवेल.
         हे एकदा करून जमणार नाही.कारण घरात तर रोज कचरा येतोच ना.आपण रोजच झाडून काढतोच ना घर स्वच्छ करायला.तसं मनातही येत असेलच की रोज रोज हा कचरा.तर याची सवयच लावायची आहे.आपलं व्यक्तिमत्वच माफ करणारं बनवायचं आहे.हळूहळू तुम्हाला नक्कीच हलकं,प्रसन्न आणि मस्त वाटायला लागेल.
            मग जपून काय ठेवायचं आहे.बघा आपण जेवढ्या सुंदर सजावटीच्या वस्तू आहेत त्या जपतो.फुलांना आयुष्य किती कमी असते तरी आपण त्यांना घरात ठेवतो.तसंच कुणी तुमच्याशी चांगले वागले असेल,मग कितीही छोटा प्रसंग असू द्या.जपून ठेवा.प्रत्येक व्यक्तीत काहीतरी चांगलं असतंच ते पहा.तशी सवय लावा.मग बघा आपलं मन नक्की सुगंधी होतंय.
                                श्री.प्रदीप सुरवसे©
                                 9545554637

Friday, June 4, 2021

जागतिक पर्यावरण दिन

 

     जागतिक पर्यावरण दिन  

लेखन : श्री.प्रदीप सुरवसे©      

           पर्यावरणाची सुरक्षा आणि संरक्षण करण्यासाठी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.५ जून १९७४ ला पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला.या दिवसाला Eco Day,World Environment Day,WED असेही म्हणतात.यात दरवर्षी १४३ पेक्षाही जास्त देश सहभागी होतात.हा पर्यावरणीय उत्सव साजरा करण्यासाठी १९८७ पासून यजमान देश दरवर्षी बदलण्याची पद्धत सुरू झाली.दरवर्षी नवीन देश व शहर आणि नवीन थीम यात घेतलेली असते.आजपर्यंत भारत दोन वेळा यजमान देश होता.२०११ ला थीम होती Forests Nature At Your Service आणि २०१८ ला Beat Plastic Pollution.


 सध्या कोरोना सारख्या जागतिक महामारी मुळे काही काळ का होईना लोकडाऊन मुळे जगभरात मोठमोठी कारखाने बंद राहिली. जी कधीच बंद राहू शकली नसती.त्यामुळे कारखान्यातून निघणारे सर्व टाकाऊ पदार्थ मग ते पाणी असो वा धूर,यामुळे होणारे प्रचंड प्रमाणावरील प्रदूषणाला खूप मोठा ब्रेक मिळाला.सर्वच मानवजातीला कमी अधिक प्रमाणात घरात राहावे लागले.म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांचा वापर अचानकपणे कमालीचा कमी झाला.आणि वाहनातून निघणाऱ्या विषारी वायूमुळे गुदमरणाऱ्या वसुंधरेने थोडासा श्वास घेतला.

              


पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट विचार करायला लावणारी आहे.पूर्वी निसर्गाने याचे संकेत खूपदा दिले.झाडे लावा झाडे जगवा,का ते आता कळतंय.ऑक्सिजन अभावी कितीतरी रुग्णाचे मृत्यू झाल्याचा बातम्या अगदी ताज्या आहेत. एक पूर्ण वाढलेलं झाड दरवर्षी ११८ किग्रॅ एवढे ऑक्सिजन पुरवते.आणि दोन पूर्ण वाढ झालेली झाडं ४ सदस्य असणाऱ्या कुटुंबाला ऑक्सिजन द्यायला पुरेशी आहेत.वेगवेगळ्या कारणांसाठी दरवर्षी लाखो झाडे कापली जातात पण लावली आणि जगवली किती जातात आपल्याला माहीत आहेच. आज माणसं जेव्हा ऑक्सिजन अभावी मरायला लागली तरीही आपल्याला झाडांचं महत्व कळत नाही. दरवर्षी फोटोपुरती लाख-कोटी झाडं लावली जातात. यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आयुष्यात फक्त एकच झाड लावलं आणि जोपासलं तरी पुरेसं आहे.कारण भारताची लोकसंख्या १४० कोटी आहे म्हणजे किमान १०० कोटी झाडं सहज लावली जातील.झाडं लावतांना वड,पिंपळ,आंबा,चिंच,जांभूळ,कडुलिंब यासारखी झाडं निवडल्यास आणखी उत्तम होईल.काही गावांच्या बाजूला माळरान,डोंगर भाग,तर प्रत्येक गावाला गायरान आहेच.अशा ठिकाणी त्याच गावातील तरुणांनी झाडं लावायला सुरुवात केली तर परिसर हिरवागार व्हायला काहीच वेळ लागणार नाही.

एकूणच झाडं,जंगल आणि पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने वन्य जीव जंगलाबाहेर फिरत आहेत.वस्तीत वन्य प्राणी घुसण्याची कारणे देऊन त्यांची हत्या केली जात आहे.अप्रत्यक्ष होणारी शिकार तर कुणालाच माहीत नाही.यात काही वन्य प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मानवाने वन्य प्राण्याला वाचविणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेऊन पाऊले उचलली पाहिजेत.अन्यथा मानव जंगली प्राण्याचं भक्ष्य व्हायला वेळ लागणार नाही.

             


पूर्वी खूप पाऊस पडायचा असं सांगतात. पण पाऊसमान आता हळू हळू कमी होत आहे.जलचक्र बिघडले आहे.शेतकऱ्यांना दोनदा तीनदा पेरण्या कराव्या लागतात.पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडतो आणि मग लगेच महिनाभर गायब होतो.शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसतो.हे सर्व पर्यावरणीय असंतुलनाचे परिणाम आहेत.मागच्या १५ वर्षात आपण बघतो आहे.जगातील तापमानात वर्षानुवर्षे वाढ होत आहे.दरवर्षी उन्हाळ्यात उष्णता कमालीची वाढत आहे.मानवाने त्याच्या गरजा मर्यादित ठेवून साधे जीवन जगल्यास आणि मागणीच न केल्यास बाजारात बऱ्याच वस्तूंचे उत्पादन घटेल.खाजगी वाहनांचा वापर कमी करणे,ग्रीन हाऊस चा वापर कमी करणे,शेतातील पालापाचोळा न जाळणे,जंगलातील वणवे रोखणे,कारखान्यांचा वापर कमी करणे,जास्तीत जास्त वृक्ष लागवड व जतन करण्याने आपण तापमान वाढ रोखू शकतो.चला तर या निमित्ताने एक तरी झाड लावूया.

जागतिक पर्यावरण दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा….!   प्रदीप सुरवसे©५.६.२०२१